कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने आता त्यांच्यावर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.
जय जय श्रीराम #ModirSatheBangla#PoribortonYatra @nityanandraibjp pic.twitter.com/xvYyunYOeS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 22, 2021
देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. 22) पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले असून त्यांनी ट्विटर हॅँडलवरून काही फोटो शेअर करून बंगालमधील सतगाचिया विधानसभा मतदारसंघात अम्तालापासून परिवर्तन रॅली सुरू केल्याची माहिती दिली आहे. यावेळी बंगाली जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आणि स्नेह बघायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित आहे, ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, याठिकाणी भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. डायमंड हार्बर येथे झालेल्या प्रचारसभेत फडणवीस यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला. स्वत:च्या राजकारणासाठी पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही तर गरिबांसाठी असलेली आयुष्यमान भारत योजनेत मिळणाऱ्या 5 लाखांपर्यंत मोफत उपचार यापासून सर्वसामान्य जनता वंचित असल्याचे टीकास्त्र फडणवीस यांनी ममता सरकारवर सोडले आहे.