एकनाथ खडसेंच्या ‘दे धक्क्या’नंतर देवेंद्र फडणवीसांचं पक्षातील Social Engineering सुरू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सतर्क झाले आहेत. इतर पक्षातून आयात केलेले आणि पक्षांतर्गत विरोधकांना सांभाळण्याचं मोठं आव्हान आता फडणवीसांसमोर आहे. त्यामुळं आता त्यांची मर्जी राखून वेळप्रसंगी पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न फडणवीस करताना दिसत आहेत. फडणवीसांच्या 3 दिवसांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात याचा प्रयत्य आल्याचं दिसून आलं.

फडणवीसांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात ही शरद पवारांच्या (Sharad Pawar) बारामतीमधून झाली. यावेळी विमानतळावर फडणवीसांचं स्वागत केलं ते म्हणजे रासपतून भाजपत आलेले राहुल कुल (Rahul Kul), राष्ट्रवादीतून आलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर ( Ranjeetsingh Nimbalkar), रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil), काँग्रेसचे जयकुमार गोरे (Jaykumar Gore), वंचितमधून आलेले गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि अर्थात सोबत होते मनसेतून आलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी. पुणे जिल्ह्यातील दौरा करून फडणवीसांनी दुपारचं जेवण केलं ते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील बंगल्यावर.

यानंतर पहिल्या दिवशी मुक्काम केला पवारांचे एकेकाळचे स्वकीय राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरी. आदल्याच दिवशी उस्मानाबादेत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबियांना पन्हा पक्षात एन्ट्री नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर लगेच दुसऱ्या दिवशी दौऱ्या दरम्यान राणा जगजितसिंहांनी फडणवीसांना स्वत:च्या गाडीत बसवून स्टिअरींग व्हिल हाता घेऊन अक्ख्या दौऱ्याचं स्वारथ्य केलं होतं.

खास बात अशी की, दुसऱ्या दिवशी दौऱ्याचा भाग नसतानाही वाट आडवी करत फडणवीस यांनी बीडमध्ये अचानक गोपीनाथ गडाकडे ताफा वळवला. मुंडेंचं दर्शन घेऊन सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सुखद धक्का दिला. सोबत पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) नसतानाही या दर्शनाची बीडमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर अंबाजोगाईच्या शेतकरी मेळाव्याचं नियोजन राष्ट्रवादीतून आलेले आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांच्या देखरेखीत केलं होतं.

यानंतर फडणवीसांनी औसा येथे रमेश कराड यांच्या घरी जेवण केलं. रमेश कराड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि आता भाजपचे आमदार आहेत. यानंतर त्यांनी गंगाखेडमध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या फार्म हाऊसवर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. खास बात अशी की या संवाद सभेत गुट्टे यांनी वेळ पडली तर सरकारच्या विरोधात लाखांचा मोर्चा काढण्याची आणि फडणवीसांनी ताकद देण्याची तयारी दर्शवली. त्यापुढं परभरणीमध्ये मोहन फड यांच्या घरी सांत्वनाला गेलेल्या फडणवीसांसोबत पंकजा मुंडे दौऱ्यात सहभागी झाल्या. या रात्री फडणवीसांनी पुन्हा मेघना बोर्डीकर यांच्या घरी मुक्काम केला. मेघना यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, परभणी, हिंगोली, जालना ते औरंगाबाद या संपूर्ण दौऱ्या दरम्यान खडसेंच्या सोडचिठ्ठीच्या बातमीनं भलताच जोर धरला होता. परंतु यावेळी त्यांच्यासोबत पंकजा मुंडे असल्यानं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होताना दिसला.

या सर्वांच्या घरचा पाहुणचार हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जरी केवळ दौऱ्याचा भाग असला तरी त्या त्या भागातील नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी स्थानिक राजकारणात तो प्रचंड बळ देणारा ठरतो. त्यामुळं अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी सोशल इंजिनियरींग करण्यास सुरुवात केली यात शंका नाही.