‘बाबांच्या नावाने मतं मिळणार नाहीत..!’ : धनंजय मुंडेंची पंकजा-प्रीतम मुंडेंवर बोचरी टीका

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – आमच्या दोन्ही भगिनी एक खासदार तर एक पालकमंत्री आहे.  कुणी पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात , असे नाही..!  असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केली आहे . केवळ माझे बाबा असे म्हटल्याने मतं पक्की होत नाहीत , असेही ते म्हणाले .  इतकेच नाही तर ,  तुमच्या वडिलांच्या नावाने काढलेलं महामंडळ रद्द केले तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसला आहात . माझ्यासारखा अशा सत्तेला लात मारून निघून गेला असता . अशा शब्दात सडकून टीकाही त्यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते . यावेळी त्यांनी प्रीतम आणि पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली . यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “एवढं सगळं तुम्ही भरभरून दिलं मात्र तुम्हाला काय मिळालं . 2004 ची पुनरावृत्ती पुन्हा 2019 ला होणार आहे . बीडचा उमेदवार सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे” असे ते म्हणाले.

‘मला त्यांची कीव येते’

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, “दबंग खासदार म्हणजे दादागिरी करणारे खासदार असे नाव आमच्या बहिणीला कुणीतरी ‘दबंग’ नाव दिले , मला त्यांची कीव येते . दोन्ही बहिणींना एवढाच प्रश्न आहे की, तुमच्या कारकिर्दीत शेजारच्या लातूरला रेल्वे डब्बा बनवण्याचा कारखाना झाला तुम्ही काय केले ?” असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

‘त्यांची पातळी किती खालावली आहे’

भाजपावर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की, ” भाजपही आमची मॅच फिक्सिंग आहे असं सांगत आहे. परंतु आमचा उमेदवार मॅच विनिंग आहे . जर हे राजकारण जनावरांच्या छावणीत करत असतील तर त्यांची पातळी किती खालावली आहे हे दिसून येते ” असा आरोपही मुंडे यांनी केला आहे . कर्तृत्वाने अमरसिंह पंडित मोठे असतील तरी बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली ,  असे ते बीड लोकसभेच्या उमेदवारीवरुन बोलताना म्हणाले.

..तर मग कर्जमाफी कशी मिळणार ?

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही आपली तोफ डागली . मुंडे म्हणाले की, “शेतकऱ्याला बायकोसोबत ऑनलाइन कर्जमाफीसाठी का बोलवता ? याविषयी मुख्यमंत्र्यांनाही मी बोललो. जर शेतकऱ्याचे बायकोसोबत भांडण झाले असेल आणि बायको सोबत यायला तयार नसेल तर मग कर्जमाफी कशी मिळणार ? असा सवाल मुंडे यांनी केला.