सुरक्षा कमी करुन सरकारचा आव्हाडांना मारण्याचा कट आहे का ? : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आव्हाड आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्था कमी केल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तसेच आव्हाडांची सुरक्षा व्यवस्था कमी करून सरकारने त्यांना मारण्याचा कट रचला आहे का ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. नाशिक येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आव्हाड आणि भुजबळ या दोघांची सुरक्षा कमी करणं ही बाब गंभीर असून निवडणूक तोंडावर असताना असा निर्णय धक्कादायक आहे, असं मत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. “जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा कमी करुन सरकारने त्यांना मारण्याचा कट रचला आहे का ?,” असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर छगन भुजबळ मोठे नेते आहेत. ते सरकारवर तुटून पडत असल्याने सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप मुंडेंनी केला. तसंच असं गलिच्छ राजकारण करुन नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान “ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी,” असं सांगत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाडांना फेसबुकवरून धमकी
जितेंद्र आव्हाड यांना यांना ठार मारण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती. सोशल मीडियाचा वापर करून “आव्हाड को खत्म कर दो” अशी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांकडून एमआयएमच्या एका कार्यकर्त्याला अटक देखील करण्यात आली होती. सोशल मीडियावर जिवे मारण्याच्या धमकी संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चिंता व्यक्त केली होती. आता धनंजय मुंडे यांनी देखील आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्याने प्रश्न उपस्थित केला आहे.