बीडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर धनंजय झाले ‘कवी’ ; ‘बस्स तू लढना मत छोडना’ म्हणत मुंडेंचं कार्यकर्त्यांना ‘बूस्टिंग’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला निकालाचा चांगलाच झटका बसला. बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार बजरंग सोनावणेंना पराभव पत्करावा लागला. तेथील प्रचाराची जबाबदारी राष्ट्रावादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याकडे होती. मात्र आलेल्या पराभवाने कार्यकर्ते खचून जाऊ नयेत म्हणून मुंडेंनी त्यांना धीर दिला आहे. ‘बस्स तू चलना मत छोडना…’या कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ते माध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी बजरंग सोनावणे यांच्यासाठी एक कविता म्हटली. कविता म्हणत बजरंग सोनावणेंना आधार देण्याचे काम त्यांनी केले.

तू दौड मे अव्वल आये ये जरुरी नहीं..
तू सबको पीछे छोड दे, ये भी जरुरी नहीं..
जरुरी है तेरा दौड मे शामील होना..
जरुरी है तेरा गिरकर फिरसे खडा रहना..
जिंदगी में इम्तिहान बहोत होंगे
आज जो आगे है, कल तेरे पिछे होगा
बस तू चलना मत छोडना, बस तू लढना मत छोडना
ही कविता म्हणत त्यांनी फक्त बजरंग सोनावणेंनाच आधार दिला की ही कविता त्यांना स्वतःला लागू पडते का, अशी चर्चा सुरु आहे. कारण येथील प्रचाराची धुरा धनंजय मुंडेवर होती. मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. बीडच्या नागरिकांनी पुन्हा एकदा प्रीतम मुंडेंनांच मताधिक्याने निवडून दिले.

दरम्यान, प्रीतम मुंडेंच्या या विजयासाठी धनंजय मुंडेंनी त्यांना शुभेच्छा ही दिल्या होत्या. भाजप नेत्यांनी तीनशेच्या पुढे जागा जिंकू, हा केलेला दावा खरा ठरला. नेमके तेच आकडे येत असतील तर अभ्यास करावा लागेल, असं धनंजय मुंडे म्हणाले होते.