उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं, पण… : नारायण राणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील चाळीस वर्षात कधीही राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी काम केले नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील असे कधीच मला वाटले नव्हते. त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्याचा कसलाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही माहित नाही, पण राज्यातील जनतेचे मात्र नक्कीच नुकसान होणार असल्याची खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली. पुण्यातील एका कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते.

नारायण राणे पुढे म्हणाले, शिवसेनेमध्ये मी 39 वर्षे होतो. या काळात बाळासाहेबांच्या जवळ आलो. साहेब म्हणायचे की, नारायण मनाची श्रीमंती ठेवावी, म्यानात एकच तलवार राहू शकते. माझे गुरु बाळासाहेब ठाकरेच आहेत, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, मोहन जोशी, घटनातज्ज्ञ उल्हास बापट, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना नारायण राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर पाहिले. ते अभ्यासू व्यक्ती, सहनशील, कोणावर रागवले नाही. कधी उत्तर दिले नाही असं नाही पण त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा घालून दिलेला आदर्श त्याला साजेसे काम केले आणि पत सावरली. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा मान सन्मान ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

चिरंजीवाच्या हट्टामुळे ‘नाईट लाईफ’
व्यक्ती म्हणून मला कधीही वाटले नव्हते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. मात्र, पदाचा मान ठेवावा लागतो. उद्धव अनुभव शून्य व्यक्ती असल्याने राज्य अधोगतीकडे जाईल असा ईशारा देताना त्यांनी नाईट लाईफ बाबत वक्तव्य केले. नाईट लाईफची मागणी कोणाचीच नसताना तो केवळ चिरंजीवाचा हट्ट आहे. हा बालहट्ट पुरविण्याऐवजी इतर प्रश्नात लक्ष घालावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

फेसबुक पेज लाईक करा –