धक्कादायक ! बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

तिरुवनंथपुरम : वृत्तसंस्था– केरळात निपाहने पुन्हा तोंड वर काढलेले असताना आता बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (आयईएस) या आजाराने तब्बल १९ मुलांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मागील पाच दिवसांत या आजाराने येथे थैमान घातले आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात १५ तर अन्य खासगी रुग्णालयांमध्ये ४ मुलांचा मृत्यू झाला असून अनेक मुलांवर उपचार सुरू असल्याचे येथे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने २२ मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याचे लोकांनी सांगितले. २०१४ पासून इन्सेफेलाईटिस हा आजार मुलांना होत आहे. शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाईटिस आजाराने ग्रस्त ३८ मुलांना दाखल करण्यात आले. अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या आजाराने १९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी दिली.

इन्सेफेलाईटिसची लक्षणे
हा आजार पाच ते दहा वयोगटातील मुलांना होतो. ताप येणे, डोकं दुखणे, अशक्तपणा येणे, उलट्या होणे, भूक न लागणे, अतिसंवेदनशील होणे ही या आजाराची लक्षणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अशी घ्या काळजी
या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. अस्वच्छ पाण्यापासून दूर राहावे, आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. मच्छारांचा उपद्रव असल्यास त्यावर उपाययोजना करावी.