‘एल्गार’ वरुन शिवसेना-राष्ट्रवादीत ‘मतभेद’ आहेत का ? अजित पवारांचा ‘मोठा’ खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेच्या चौकशीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु आहे. याप्रकरणाची चौकशी एसआयटीच्या माध्यमातूनच करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावून धरली होती. एनआयएने या प्रकरणाची चौकशी करण्याला त्यांचा ठाम विरोध असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास एनआयएला मंजुरी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयएला मंजुरी दिल्याने महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही असं स्पष्ट झालं होतं. नंतर शरद पवारांनी घेतलेल्या काही पत्रकार परिषदांमध्ये यावर नाराजी व्यक्त केली. मात्र, चौकशीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.

एल्गार प्रकरणावरून शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेत का ? अशी चर्चा होत होती. यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीत देखील यावर चर्चा चाली. सीएए, एनआरसी आणि एनपीआरलाही राष्ट्रवादीने तीव्र विरोध केलाय. तर उद्धव ठाकरे यांनी एनआरसीला विरोध असल्याचे सांगत इतर दोन्ही कायद्यांना मात्र विरोध नसल्याचे स्पष्ट केलं होतं. या सगळ्या मतभेदांच्या चर्चेवर अजित पवारांनी खुलासा केला आहे.

शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवनेरीवर एकत्र आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. सगळे प्रश्न आम्ही समन्वयाने सोडवू. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते. मात्र, आम्ही पाहिले आमच्या किमान समान कार्यक्रमाला बांधील आहोत.