ठाकरे सरकारला आणखी एक धक्का ! DG सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता DIG मनोजकुमार शर्मा देखील केंद्रीय सेवेत

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप उघड झाल्यानंतर राज्य पोलीस दलासह राज्य सरकारही अडचणीत आले आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्यास विरोधी पक्षांनी सुरूवात केली आहे. राज्य सरकारला बसलेल्या या धक्क्याची तीव्रता अजूनही कमी झालेली नसतानाच राज्य सुरक्षा महामंडळातील उपमहानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. यामुळे राज्य सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. शर्मा हे देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणारे शर्मा हे गेल्या तीन महिन्यांतील तिसरे आयपीएस अधिकारी आहेत. हे तिनही अधिकारी भाजपाशी जवळीक असलेले आहेत. मनोजकुमार शर्मा हे एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या संघर्षमय आत्मचरित्रात्मक पुस्तक स्पर्धा परीक्षा देणार्‍या तरूणींनी अशरक्ष: डोक्यावर घेतले. या पुस्तकाची सर्वाधिक ऑनलाइन सर्वाधिक विक्री झाली आहे.

हे 3 आयपीएस अधिकारी 3 महिन्यांत गेले केंद्रात

* सर्वप्रथम तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल सीआयएसएफचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने ते 7 जानेवारीला पदावरून कार्यमुक्त झाले.

* त्यानंतर 8 फेब्रुवारीला नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अपर महासंचालक म्हणून केंद्रीय गृह विभागाने त्यांची नियुक्ती केल्याने त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले.

* आता मनोजकुमार शर्मा यांच्या ‘सीआयएसएफ’मध्ये पाच वर्षे प्रतिनियुक्तीचे आदेश केंद्रीय गृह विभागाने काढले आहेत. शर्मा हे 7 महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत आहेत.