कुठे नेउन ठेवलयं पुणे ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेतील सत्तेच्या दोन वर्षांमध्ये अंदाजपत्रकामध्ये घोषित केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले . नियोजनाअभावी पुणेकरांवर ऐन उन्हाळ्यात पाण्याचे संकट लादले . महापालिका भ्रष्टाचाराच्या जलपर्णीत गुंतवली असून कुठे नेउन ठेवलयं पुणे ? असा टोला विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सत्ताधारी भाजपला लगावला आहे.

महापालिकेतील भाजपची सत्ता स्थापन होवून दोन वर्षे (मार्च १५) झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते दिलीप बराटे यांनी सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उडविताना भाजपच्या अपयशाचा पाढाच वाचला. बराटे म्हणाले, की दोन वर्षांत तीन अंदाजपत्रक मांडण्यात आली. पहिल्या दोन अंदाजपत्रकांत मांडलेल्या योजनांची अंमलबजावणीच झाली नाही. पंडीत दीनदयाळ विमा योजना जनतेपर्यंत पोचविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. भारतरत्न अटल बिहारी मेडीकल कॉलेज उभारणीसाठी सल्लागाराला वर्क ऑर्डर देण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्षांना सभेत प्रशासनाला धारेवर धरावे लागले. ज्येष्ठ नागरीक आणि झोपडपटयांमध्ये राहाणार्‍या किशोरवयीन मुलींची मोफत आरोग्य तपासणी होवू शकली नाही. कचरा व्यवस्थापनाच्या नावाने शिमगाच आहे . तर प्रकल्प बंद करण्यात आले आहेत. नदी सुधार योजना दोन वर्षात कागदावरच असून केवळ निधी मिळविल्याच्या श्रेयाचे फलक मात्र लावण्यात

ई लर्निंग शाळा सुरू झाल्या नाहीत, भामा आसखेड योजना रखडली आहे. बालभारती ते पौड रस्ता तसेच तळजाई ते सिंहगड रस्ता बोगद्याने जोडण्याच्या कामाचा साधा अहवालही केला गेला नाही. सिंहगड रस्त्यावर उड्डापुल उभारण्यासाठी दोन वेळा अंदाजपत्रकात केलेली तरतूद , गल्लीबोळातील कामांसाठी वर्गीकरण करण्यात आली. शिवसृष्टीचे आश्‍वासन देणार्‍या सत्ताधार्‍यांना शिवसृष्टी, हज हाउस आणि वारकरी भवन उभारायचेच नसल्याचे पाहायला मिळत आहे. सायकलींचे शहर असा टेंभा मिरवला जात असताना शेकडो सायकली कचर्‍यात पडल्या आहेत. उद्यानांची दुरावस्था झाली असून श्‍वान संगोपन केंद्र ही केवळ घोषणाच राहीली आहे. भिडे वाडा आणि लहुजी स्मारक उभारण्यासाठी कुठलिच हालचाल झालेली नाही.

स्मार्ट पुण्यामध्ये केवळ भिंती रंगविल्या असून स्मार्ट सिटीचा निधीच खर्च न झाल्याने नव्याने निधी मिळणे बंद झाले आहे. बसेसची संख्या वाढविण्यासाठी म्हणावेसे प्रयत्न होताना दिसत नाही. चांदणी चौकाचे तीन वेळा उदघाटन झाले परंतू वर्ष उलटूनही अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही. केवळ निधीचे वर्गीकरण आणि भ्रष्टाचार यावरच सत्ताधार्‍यांचा भर असून आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ज्या पुणेकरांनी विश्‍वासाने ९८ नगरसेवक, ८ आमदार आणि एक खासदार निवडून दिला हे सर्वजण पुण्याचा विकास करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप बराटे यांनी केला.