‘हार-तुरे नकोत रोख पैसेच द्या तर लगेच पावतीही देतो’, दिलीप वळसे-पाटलांनी केलं निवेदन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर नव नियुक्त पालकमंत्री दिलीप वळसे पाटील पहिल्यांदाच सोलापूरमध्ये आले आहेत. यावेळी त्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. सोलापूरकरांनी केलेल्या स्वागतामुळे आपण भारावून गेल्याचे वाळसे पाटील यांनी सांगितले. तसेच आपल्या स्वागतासाठी हार-तुरे आणि फटाक्यांची आतषबाजी केलेली मला आवडत नाही. यापुढे येताना अशा गोष्टी आणू नका. त्याबदल्यात मला पैसे द्या, मी लगेच तुम्हाला पावती देतो. या पैशातून शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांचा उपचार करता येईल असे वळसे पाटील यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी शिवछत्रपती रंगभवन येथे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यावेळी बोलताना हार-तुरे फेट्यांऐवजी पक्ष कार्य़कर्त्यांना चक्क पैशांची मागणी केली. पेसे घेण्याचे कारण समोर आले त्यावेळी उपस्थित देखील भारावून गेले. हार तुरे न आणता पैसे द्या, मिळणारा पैसा शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी पडेल. वर्षाला आठ ते दहा लाख रुपये मिळत असल्याचे सांगून मिळालेला पैसा मी आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष संघटना वाढवावी लागेल. तसेच राज्याचा सर्वांगीण विकासही साधायचा आहे, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. सोलापूरच्या विकासाचे प्रश्न शरद पवार यांच्या सुचनेनुसार सोडवण्यासाठी आपल्यावर सोलापूरच्या पालकमंत्र्याची जबाबदारी देण्यात आले असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –