मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही चालते, दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे मत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही आहे, मक्तेदारी चालते. पडद्यामागून ही सूत्रे हलवली जातात, असे मत निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडले आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यावर भाष्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर कलाविश्वातील घराणेशाहीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोस्ट केली आहे. इंडस्ट्रीत कोणी नवीन आले असेल, काही चांगले काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचे काम इथेही केले जाते. एखाद्याची कला चांगली असेल, तो उत्तम अभिनेता असेल आणि अनेक वर्षे काम करत असेल तरी त्याला संपवण्याचा घाट इथलीच काही मंडळी करत असतात. ही मंडळी स्वत:ला अतिशहाणे समजतात. समोरून हे वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्र हलवली जातात, अशी टीका त्यांनी केली आहे.

मला अनेकांनी आव्हान दिले होते की तुला इंडस्ट्रीतून काढून टाकेन. मी माझ्या जिद्दीने टिकून आहे. ही लोक मानसिक खच्चीकरण करतात. माझ्या चित्रपटांवरून अफवा उठवल्या गेल्या. मी असे अनेक राजकीय डाव हाणून पाडले आहेत. शेतकरी कुटुंबातून मी इथवर आलो. गॉडफादर नसतानाही पाय रोवून उभा आहे. ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचे कोणीच कधी कौतुक केले नाही. चित्रपट प्रदर्शनापूर्वी ही लोक अनाथाश्रमात जातात, खोटे रडतात आणि त्यांची प्रसिद्धी केली जाते. पण प्रामाणिकपणे काम केलेल्यांचे कौतुक केले जात नाही. इंडस्ट्रीत फक्त 20 टक्के लोक चांगली आहेत. बाकी सगळी ग्रुपमध्ये वावरणारी आहेत. नको त्या चित्रपटांना पुरस्कार दिले जातात, त्यांचा उदोउदो केले जात असून त्यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. नवीन आलेल्या कलाकारांना पाण्यात बघितले जातात. अशी टीका टिळेकर यांनी केली आहे.