मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त मुंबईतील ५०,००० पोलिस कर्मचार्‍यांना मिठाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश आज (दि 9 मार्च) विवाह बंधनात अडकणार आहेत. विवाहाच्या आधीच अंबानी यांनी मुंबईतील 50 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मिठाईचे बाॅक्स पाठवल्याचे समजत आहे. मुख्य म्हणजे मुंबई महानगरातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये मिठाईचे बॉक्स पाठवण्यात आले आहेत.

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश (28) हे श्लोका मेहता (28) यांच्याशी आज विवाहबंधनात अडकतील. श्लोका मेहता या हिरे व्यापारी रसेल मेहता आणि मोना मेहता यांच्या कन्या आहेत. दरम्यान  विवाहाच्या आधीच अंबानी यांनी मुंबईतील 50 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मिठाईचे बाॅक्स पाठवल्याचे समजत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “मला पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर एक मिठाईचा बॉक्स मिळाला. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचे हे गिफ्ट असल्याचे इतर सहकार्‍यांनी सांगितले.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “आकाश आणि श्लोकाच्या विवाह समारंभाला आम्हाला आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा अपेक्षित आहेत. असे संदेश प्रत्येक बॉक्सवर लिहिले आहेत. खाली विनित म्हणून नीता-मुकेश अंबानी, ईशा-आनंद आणि अनंत यांची नावे आहेत.”

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार विवाह

आकाश आणि श्लोका यांचा विवाह मुंबईतील बांद्रा- कुर्ला काॅम्पलेक्समधील जिआे वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. रिपोर्टनुसार, आकाश यांची वरात ट्राइडेंट हाॅटेलमधून निघेल. 7 वाजून 30 मिनिटांचा विवाह मुहुर्त आहे. 11 मार्च रोजी त्यांच्या विवाहाचे रिसेप्शन असणार आहे.

2000 अनाथ मुले आणि वृद्धांना अन्नदान

दरम्यान, मुकेश आणि नीता अंबानी यांनी मुंबईतील 2000 अनाथ मुले आणि वृद्धांना अन्नदान केले. यावेळी आकाश आणि श्लोका यांनी मुलांना जेवण वाढण्याचेही काम केले. मुकेश आणि नीता यांनी कन्या ईशाच्या विवाहाच्या आधी देखील अन्नदान केले होते. राजस्थानमधील उदयपूरमध्ये अंबानी यांनी 5000 हून जास्त नागरिकांना अन्नदान केले होते.