Satara : दुकानात गर्दी दिसल्यास दुकान 7 दिवस बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन –  तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात धडक मोहीम पोलीस नगरपरिषद आणि विविध विभागात राबिवण्यात येणार आहे. जे नागरिक, दुकानदार शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे., अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

यापूर्वी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे सहकार्य करावं. कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात कमी आढळत असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला या गैरसमजुतीमध्ये राहू नये. लस यायला आणखीन काही महिने लागतील. लास आली तरी ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. प्रत्येक नागरिकांनी मास्क घालून सुरक्षित अंतर ठेवावे. स्वच्छता वारंवार केली पाहिजे. आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या वृद्धांची काळजी घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, की आजही काही दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. सुरक्षिततेचं पालन केले जात नाही अशी दुकाने सात दिवस बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मास्क असल्यास ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यात यावा. दुकानात सुरक्षित अंतराचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी. कोरोनाबाधित यांच्या संसर्गात आलेले नागरिक तपासणी करण्यास विरोध करताहेत. खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्य विभागाची टीम तपासणीसाठी आल्यास त्यांना टाळू नये, संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.