शनिवार वाड्यावर कार्यक्रम नको : हायकोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्याच्या शनिवारवाड्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र या कार्यक्रमाच्या परवानगीला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुणे पोलिसांचा परवानगी नाकारण्याचा निर्णय न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने योग्य ठरविला.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. विश्‍वजित सावंत यांनी, या कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. न्यायव्यवस्था आणि संविधानावर आधारित एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

मात्र, या कार्यक्रमामुळे सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो असे कारण पुढे करत पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याने परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आयोजकांना आता दोन दिवसांत कार्यक्रमासाठी पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.