‘गुपकर आघाडीच्या अजेंड्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   “जम्मू-काश्मीरमध्ये भारतविरुद्ध शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करून तिथे पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी गुपकर नावाने तिथल्या अनेक पक्षांचे एकत्रीकरण झाले आहे. यामध्ये काँग्रेसचासुद्धा समावेश आहे. काँग्रेसला आमचा प्रश्न आहे की, त्यांचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का ?,” अशी विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबईत देवेंद्र फडणवीस वार्ताहरांना बोलत होते. ते म्हणाले, “फारुख अब्दुल्ला यांच्यासारखे ज्येष्ठ नेते चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू असे म्हणतात. याचे मला आश्चर्य वाटते. तेव्हाच माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती राष्ट्रीय झेंडा जम्मू-काश्मीरमध्ये लावू देणार नाही, असे वक्तव्य करतात. अशा लोकांच्या आघाडीत काँग्रेसचा सहभाग असेल, तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारू. देशासमोर काँग्रेसला उघडं पाडण्याचे काम करू,” असा घणाघात त्यांनी केला.

“काश्मीरमध्ये पीडीपी आमच्यासोबत असेपर्यंत भारताच्या तिरंग्यावर बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आता ते तिरंग्याचा अपमान करत असताना काँग्रेस त्यांच्याबरोबर जात आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावरती उत्तर द्यावे,” असा सवालदेखील त्यांनी विचारला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीमधील कलम ३७० हे ७० वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या संघर्षांनंतर रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर, लडाखचे संपूर्ण विलगीकरण करण्यात आले असून, तेथील जनजीवन सामान्य झाले आहे. तेथे आज कोणताही भारतीय गुंतवणूक करू शकतो,” असेही फडणवीस म्हणाले.