… म्हणून राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची आमदारकीची ऑफर 2 दिवसांत नाकारली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यपाल कोट्यातून मिळणाऱ्या जागेवरून भलतेच कोंडीत सापडल्याचे दिसत आहेत. एकीकडे दुरावलेल्या विरोधकांनी चालवलेले टीकेचे प्रहार आणि स्वकीयांनीच केलेले घाव, यामुळे राजू शेट्टी व्यथित झाले आहेत. त्यामुळे त्यांनी गुरुवारी पत्रक जारी करत विधान परिषदेची ब्याद नकोच, असे म्हणत त्यावरती चर्चा करायचे नाही असे शेट्टी यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

याबाबत राजू शेट्टी म्हणाले, ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानाने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवर शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वतः जरी उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. त्यावर आम्ही विचार करुन कळवतो असा उलट निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलावण्यास सांगितले. जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकार मादनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंदर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरलं. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्यानावा बाबत एकमत केले. तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांच्या पक्षाचे सचिव डाॅ. महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला.

समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात पण…

आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगांना सामोर गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. अशी भावना शेट्टी यांनी व्यक्त केली

विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको

स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ उभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मीडियावरती व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळवण्यासाठी काही वर्षे लागतात, मतभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.