Lockdown 3.0 : सरसकट नव्हे तर फक्त अडकलेल्या मजूर आणि कामगारांना घरी सोडा, केंद्राने राज्य सरकारांना फटकारले

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे बहुतांश राज्यात परराज्यातील नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनचा तिसरा टप्पा केंद्र सरकारनं देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यास मुभा दिली आहे. त्यानंतर राज्यांनी अडकलेल्या नागरिकांबरोबरच कामगारांनाही घरी पाठवण्यास सुरूवात केली असल्यामुळे केंद्र सरकारने संबंधित राज्यांना फटकारले आहे.

परराज्यात अडकलेल्या नागरिकांना परत पाठवण्याची आणि आणण्याची मागणी विविध राज्यांनी केंद्राकडे केली होती. त्यासंदर्भात केंद्राने निर्णय घेत परवानगी दिली होती. त्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यासही परवानगी दिली. मात्र, या निर्णयानंतर अनेक राज्यांनी रेल्वे आणि बस आरक्षित करण्यासाठी केंद्राकडे धाव घेतली आहे. रेल्वे आणि बस आरक्षणाची मागणी वाढल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना झापले आहे.

राज्यांकडून रेल्वे सोडण्याची मागणी वाढल्यानंतर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना तंबी दिली आहे. केंद्र सरकारने फक्त लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवण्याची आणि आणण्याची परवानगी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिली आहे. लॉकडाउनची कल्पना नसताना जे घरापासून दूर अडकून पडले आहेत. त्यामुळे तणावात आहेत, अशा लोकांनाच घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशा शब्दात भल्ला यांनी राज्यांना सुनावले आहे.