डॉ. मनमोहनसिंग यांची संसदीय कारकीर्द ‘शांततेत’ समाप्त

पुन्हा राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली : आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढणारे अर्थमंत्री आणि देशाचे दहा वर्षे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहनसिंग यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कालावधी संपला आहे. शुक्रवारी त्यांच्या सदस्यत्वाचा शेवटचा दिवस होता. इतर सदस्यांसारखे त्यांना सभागृहात अनुभव मांडण्याची संधी मिळाली नाही. राज्यसभेकडून देखील त्यांना निरोप देण्यात आला नाही. तीन दिवसानंतर संसदेचे सत्र सुरु होईल.

डॉ. मनमोहनसिंग यांना आता अजून एक कार्यकाळ मिळण्याची शक्यता फार कमी आहे. मनमोहिनसिंग आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते. परंतु आता आसाममधून पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्यासाठी लागणारे संख्याबळ काँग्रेसकडे नाही. इतर कोणत्याही राज्यातून सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा सदस्य राज्यसभेवर पाठवणे कठीण आहे. शिवाय मनमोहनसिंग यांचे ८६ वय चालू आहे.

पाच वेळेस राज्यसभेवर निवडून आले
मनमोहनसिंग पाच वेळेस राज्यसभेवर निवडून गेले. त्यांच्यापेक्षा जास्त ६ वेळा निवडून येण्याचा विक्रम नजमा हेपतुल्ला यांच्या नावावर आहे. त्या आता निवृत्त झाल्या आहेत. डॉ. सिंग यांच्याशिवाय सात अन्य सदस्य आहेत जे पाच वेळेस राज्यसभेवर निवडून गेले. पण आता ते सर्व निवृत्त झाले आहेत. डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेवर १९९१ मध्ये पहिल्यांदा निवडून गेले.तेव्हापासून ते आतापर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.

राज्यसभेतील कारकीर्द
डॉ. मनमोहनसिंग आसाममधून राज्यसभेवर निवडून यायचे. राज्यसभा सदस्य म्हणून १९९५ , २००१, २००७ आणि २०१३ सतत निवडून येत राहिले. त्यांनी १९९८ आणि २००४ मध्ये राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली. आता मनमोहनसिंग पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे.

विशेष समारंभ बोलावून दिला जावा निरोप – शिवसेना नेते संजय राऊत

राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंग पक्षीय राजकारणापेक्षा देखील मोठे आहेत. ते देशाचे दहा वर्ष पंतप्रधान राहिले आहेत. त्यांनी देशाला आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून दिशा दिली आहे. ते सभागृहातील सर्वात वरिष्ठ नेते आहेत त्यांना विधिवत निरोप दिला पाहिजे. यासाठी सरकारने सेंट्रल हॉलमध्ये विशेष समारंभ घेऊन त्यांना निरोप दिला पाहिजे.