हवाईमार्गाने अमली पदार्थाच्या तस्करीत झालीय वाढ, केंद्रीय यंत्रणांचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश व्यवहारांवर मर्यादा आली आहे. मात्र, तरी परेदशातून भारतात होणारी अमली पदार्थाची तस्करी मात्र सुरळीतपणे सुरू आहे. एअर कागरेद्वारे तस्करीचे प्रमाण वाढल्याचा दावा केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात आला आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) सप्टेंबर महिन्यात दिल्ली विमानतळावरून 10 किलो हेरॉइन, दीड किलो कोकेन, सहा किलो रसायनमिश्रित गांजा अमली पदार्थ पकडले. हे सर्व पदार्थ कुरिअर सेवेमार्फत एअर कागरेद्वारे भारतात आलेल्या विविध वस्तूंच्या पार्सलमध्ये दडविण्यात आले होते. गेल्या आठवडयात धाग्याच्या रिळांमध्ये दडवलेले कोकेन हस्तगत करण्यात आले. तर त्याआधी पार्सलसाठी वापरलेल्या खोक्याच्या पुठ्ठयात चोरकप्पा तयार करून त्यातून हेरॉइन दडविल्याचे उघड झाले.

याआधी बंगळूरुमध्ये लग्नपत्रिकांमध्ये अमली पदार्थ दडवून आणल्याचेही समोर आले होते. लॉकडाउनआधी पैशांच्या आमिषाने काही व्यक्ती शरीरात, सोबत आणलेल्या सामानात दडवून अमली पदार्थ भारतात आणत होते. मुंबईसारख्या महत्त्वाच्या विमानतळावर बॉडी स्कॅनर नसल्याने सीमाशुल्क (कस्टम) विभागाची नजर चुकवून अनेक वाहक सोबत आणलेल्या अमली पदार्थासह सहज निसटत. मात्र लॉकडाउनमध्येप्रवासी विमानसेवा बंद असल्याने एअर कागरेचा पर्याय तस्करांनी निवडल्याचे केंद्रीय यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.