पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – पोलीस निरीक्षक यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्यचे संपादक जितेंद्र पितळे व सामाजिक कार्यकर्ते प्रा. डाॅ. बाळासाहेब बळे हे सोमवारी (दि. 25) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर प्राणंतिक आमरण उपोषणास बसणार आहेत.

याबाबतचे निवेदन तक्रारदार जितेंद्र पितळे यांनी आज जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस उपअधिक्षक यांना दिले आहे. निवेदनात पितळे यांनी म्हटले आहे की, माझ्यावर 14 मार्च गुरूवारी राञी 9 ते 9.30 दरम्यान शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालक, मालक, क्लिनर व इतरांना हल्ला केला.

शासकीय धान्याची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालक व ठेकेदारासह इतरांची या प्रकरणात पाठराखण करून पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास व त्यांच्यावर कडक कलमे न लावता त्यांना गुन्हा घडुन चार दिवस झालेनंतरही अटक केलेली नाही.आरोपींना तात्काळ अटक करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे. धान्याची तस्करी करणाऱ्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार व पुरवठा निरीक्षका सहआरोपी करावे. प्रशासनाच्या गुन्हेगार बचाव धोरणाच्या विरोधात प्राणांतिक आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.