नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी मिंत्राने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, एका महिलेने मुंबई सायबर क्राइम पोलिसात तक्रार दिली होती की, कंपनीचा लोगो महिलांविषयी अपमानजनक आहे. ज्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला.
माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये अवेस्ता फाऊंडेशनच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या नाझ पटेल यांनी मिंत्राच्या लोगो विरोधात तक्रार दाखल केली होती. नाझ पटेल यांच्या म्हणण्यानुसार मिंत्राचा लोगो महिलांविषयी अपमानजनक आहे. नाझ यांनी ई-कॉमर्स कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आणि लोगो बदलण्यास सांगितले.
लोगो बदलण्यासाठी कंपनीने मागितला एक महिन्याचा कालावधी
त्यांनी सोशल मिडीयावर हा विषय उघडकीस आणला आणि लवकरच बऱ्याच लोकांचे या विषयाकडे लक्ष वेधू लागले. स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर सध्याचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. फॅशन ई-रिटेलरचा लोगो महिलांविषयी अपमानजनक आणि आक्षेपार्ह असल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे, त्यानंतर मुंबई सायबर पोलिसांनी ई-कॉमर्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. लोगो बदलण्यासाठी महिन्याभराची गरज असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मुंबई सायबर क्राइम शाखेच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, आम्हाला आढळून आले की, लोगो महिलांसाठी अपमानजनक होता. तक्रारीनंतर आम्ही मिंत्राला ईमेल पाठवला आणि त्यांचे अधिकारी येऊन आम्हाला भेटले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते एका महिन्यात लोगो बदलतील.