राज्य बोर्डाच्या 10 वी, 12 वी निकालाबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली ही माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल 15 ते 30 जुलै दरम्यान लागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकालाबाबतची माहिती दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शैक्षणिक क्षेत्रालादेखील बसला आहे. 10 वी, 12 वीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत. निकालाला विलंब झाल्यानं आता पुढील प्रवेशालाही उशीर होणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकत्रित जाहीर केला जातो. यापैकी, मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाला तेव्हा बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द केला होता. या पेपरचे गुण सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. शासनानं शाळा महाविद्यालयानं अद्याप परवानगी दिलेली नाही. बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी गुणपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावं लागतं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शासन काय निर्णय घेतं, हे पाहण महत्त्वाचं आहे.