..तर सोनिया गांधी, राहुल गांधींना निवडणूक लढवता येणार नाही : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढवू नये कारण त्यांच्या विरुद्ध आरोप असून त्या जामिनावर बाहेर आहेत, अशी टीका करणाऱ्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सुद्धा जामिनावर बाहेर आहेत, हे ध्यानात ठवावे. कारण त्यांच्याविरुद्धही आरोप आहेत मग त्यांनी का निवडणूक लढवाव्यात ? आणि जर जामिनावर असताना निवडणूक लढवायची नसेल तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सुद्धा निवडणूक लढवू शकणार नाहीत. अशा शब्दात साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी उत्तर दिले.

दक्षिण मुंबई लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी आणि कोटक यांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे. यावर बोलताना तावडे म्हणाले, मोदी सरकारवर सुटाबुटातील सरकार असे आरोप करणाऱ्या काँग्रेसचे खरे रुप आता समोर आले आहे. अंबानी, कोटक यांच्या सारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस पक्ष चालत असल्याचे आता स्पष्ट झाल्याची टीका तावडेंनी केली.

मोदी सरकार भुलथापा मारून सत्तेत आले आहे, अशी टीका करणाऱ्या शरद पवार यांच्या विधानाबद्दल बोलताना तावडे म्हणाले, शरद पवार यांनी भूलथापा तुम्ही म्हणावे हे आश्चर्यच आहे. तसेच गांधी घराण्याचा त्याग तुम्हाला आत्ता आठवतोय, पण जेव्हा तुम्ही दोन वेळा काँग्रेस सोडली. त्यावेळी तुम्ही गांधी घराण्यासंदर्भात काय काय म्हणाला होतात ते आठवून बघा. आज निवडणुकीत विरोधकांची फाटाफुट झाल्यामुळे आपल्या मनात नसताना ओठातून एक बोलणे शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांना शोभत नाही, असा टोलाही तावडेंनी मारला.