एकनाथ खडसेंकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ? मंत्रिमंडळात फेरबदल नाही, शरद पवारांनी दिले संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्याकडे कृषी किंवा गृहनिर्माण मंत्रिपद मिळण्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Nationalist Congress Party President Sharad Pawar) यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मंत्रिमंडळात कोणतेही फेरबदल करण्यात येणार नाही, असे सांगत नाथाभाऊ हे जयंत पाटलांच्यासाथीने पक्ष वाढवण्याचं काम करतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद ((eknath khadse likely to be ncp maharashtra president) जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पवारांनी हे संकेत दिले. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी माझ्याशीही चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी एका शब्दांनीही माझ्याकडे कोणत्याही पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही. 40 वर्षे भाजपमध्ये काम केलं. आता दुर्देवानं हा निर्णय घ्यावा लागत आहे. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाचं काम चांगलं सुरू आहे. आता त्यांना नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्याची साथ मिळेल. संघटना आणि प्रशासनाचा अनुभव असलेल्या अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाची जयंतरावांना साथ मिळणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाला अडचणीतून बाहेर काढता येईल, असं पवार म्हणाले.खडसे येत असल्याने काही लोकांनी त्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार? त्यांच्यासाठी कुणाला तरी घरी बसावे लागेल, अशा बातम्या सुरू होत्या. मात्र त्यात काही तथ्य नाही. त्यात कोणताही बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल.
नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे गौरोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून शक्तिप्रदर्शन करून नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले.

त्यांच्या नाराजीत तथ्य नाही
अजितदादा पवार नाराज असल्याच्या चर्चा मीडियाने चालवल्या. त्यात काही तथ्य नाही. कोरोनामुळे सहकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. अजितला ताप होता. त्यामुळे ते काळजी घेत आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असं सांगतानाच जितेंद्र आव्हाडही व्हेंटिलेटरवर असतानाही नाराजीच्या बातम्याही मीडियाने चालवल्याचे पवार म्हणाले.