‘नाराज’ असलेल्या एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यावर नव्याने सामाजिक समीकरणाची मांडणी करण्याचे काम केले आहे, असे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले होते. भाजपाच्या या स्पष्टीकरणाचा समाचार घेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचे 105 संख्याबळावरुन 50 व्हायला वेळ लागणार नाही गंभीर इशारा दिला आहे.

पक्षाच्या सामाजिक समीकरणाच्या मांडणीविषयी बोलताना खडसे म्हणाले, नव्यानं मांडणी करत असताना प्रामाणिकपणे मांडणी करावी. हा पक्ष ज्यावेळी पाहत होतो, त्यावेळी आणिबाणीचा कालखंड होता. जनता पार्टीचा कालखंड होता. त्यानंतर स्वतः मी कार्यरत होतो. तेव्हा या पक्षाची ओळख जी होती, ती मारवाडी, ब्राह्मण अशा पक्षाची ओळख होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, भाऊसाहेब फुंडकर असतील, या सर्वांनी मिळून या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. तोपर्यंत बहुजनांचा चेहरा नव्हता. इथे कुणी यायला तयार नव्हते. ओबीसींच्या संघटना तयार झाल्या. ओबीसींचे नेते तयार झाले. वर्षानुवर्षे ज्यांनी पक्षाला बळ दिले. चेहरा बदलवला. तो चेहरा बदलवणे आता आम्हाला सांगता आहात का ?, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

आमच्या ताकदीने आणि मेहनतीने पक्ष उभा केला आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी दिलेल्यांचे पक्षामध्ये काय योगदान आहे ? कितीवेळा हे तुरूंगात गेले ? कितीवेळा दगड खाल्ले ? आम्ही सायकलवर फिरलो. हमालासारखे फिरलो. कित्येक वर्ष तुरूंगात काढली. त्या हालअपेष्टांना पक्षामध्ये काही किंमत आहे की नाही ? यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जुन्या माणसांचा जेवढा जनाधार आज आहे,

वढा नवीन माणसांचा जनाधार आहे का? वर्षानुवर्ष काम करणार्‍यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीने उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचे वाईट वाटते. विरोधी पक्षात एकटे असताना 123 आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळे असून 105 आमदार आले. या प्रवृत्तीमुळे 105 आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टाने जावे लागणार आहे, नाहीतर 105 आमदारांचे 50 आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असा घणाघाती हल्ला एकनाथ खडसे यांनी केला.