एकनाथ खडसेंकडून पुन्हा एकदा फडणवीसावंर ‘निशाणा’, आता थेट मोदी-शहांची नावं घेऊन बोलले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्याकडून काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आला तसेच ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( NCP) प्रवेश करणार आहेत. त्याच्या अगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्याकडून माझा नेमका गुन्हा काय, पक्षातल्या इतर मंत्र्यांवरही आरोप झाले असताना केवळ माझाच राजीनामा का घेतला, मला वेगळी वागणूक का दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. जेव्हा भाजप आणि शिवसेनेचे सरकार होते तेव्हा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर आरोप करण्यात आले होते. पण मात्र मलाच राजीनामा देण्यास सांगण्यात आले. आणि इतर मंत्र्यांना मात्र क्लीन चीट देण्यात आले. इतरांना आणि मला वेगळा न्याय का, असा सवाल खडसेंकडून करण्यात आला आहे.

इतर पक्षांमधून आलेल्यांना पाठिशी घालण्यात आले पण पक्षासाठी गेली ४० वर्षे राबणाऱ्या नेत्यावर सातत्यानं अन्याय करण्यात आला अशा शब्दात खडसेंनी फडणवीसांवर टीका केली आहे. मी माझ्यावर होत असलेल्या अन्यायाची व्यथा मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली मात्र कोणीही मला गांभीर्यानं घेतलं नाही अशी खंत देखील एकनाथ खडसे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. ‘दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ( J.P.Nadda) यांची भेट घेतली त्यांना माझ्यावर झालेला अन्याय सांगितला. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना देखील भेटून मी माझे गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. मात्र तुम्ही देवेंद्र यांना घेऊन या. आपण चर्चेतून मार्ग काढू असं मला सांगण्यात आलं. तेव्हा मी हा निरोप मी देवेंद्रजींना दिला. मात्र त्यांनी पुढील आठवड्यात जाऊ. पुढील महिन्यात जाऊ, असं म्हणत त्यांनी ४ वर्षे घालवली,’ असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्त्व फारच सक्षम आहे म्हणून आम्ही राज्यातील सत्ता गमावली असा टोलाही खडसेंनी फडणविसांना लगावला आहे. २०१४ मध्ये आमच्याकडे पैसा, साधनं नव्हती पण तरीही आम्ही विधानसभा निवडणुकीत ( Assembly elections) शिवसेना सोबत नसतानाही १२३ जागा जिंकलो होतो. पण आता २०१९च्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात, राज्यात सत्ता असताना, शिवसेनेसोबत युती असतानाही १०५ जागांवर समाधान मानावे लागले. देवेंद्रजी निवडणुकीत मी पुन्हा येईन म्हणत होते.हा अहंकार लोकांना आवडला नाही. त्या जागी जर ते आम्ही पुन्हा येऊ म्हणले असते तर बरे झाले असते असे एकनाथ खडसे म्हणाले.