साध्वी प्रज्ञा यांनी तर चक्क भारताच्या आत्म्याचीच हत्या केली : कैलाश सत्यार्थी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर त्यांच्यावर उडालेली टीकेची झोड अजून थांबलेली नाही. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधला.

गोडसेने गांधीजींच्या शरीराची हत्या केली होती, परंतु प्रज्ञा सारखे लोक तर गांधीजींच्या आत्म्यासोबत अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. महात्मा गांधी हे सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडे होते. भाजपाने छोटया फायद्याचा मोह सोडून त्यांना तात्काळ पक्षातून काढून राजधर्माचे पालन करावे असे सत्यार्थी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर चहुबाजूनी टीका होत आहे. त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी घुमजाव करत माफी मागितली. मला महात्मा गांधींबद्दल आदर आहे. त्यांनी देशासाठी केलेले कार्य कधीच विसरता येणार नाही असे साध्वी प्रज्ञा नंतर म्हणाल्या. तत्पूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले कि साध्वीने माफी मागितली असली तरी मी त्यांना मनापासून माफ करू शकत नाही.