आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात कोट्यावधीचा काळा पैसा जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून मोठं घबाड जप्त करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ११२ कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या हेराफेरीला लगाम घालण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

१० मार्च २०१९ पासून महिन्याभरात या पथकाने राज्यातून ११२ कोटी रुपये किंमतीचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या कारवाईत ४०.२४ कोटी रुपयांची रोकड, ४४.७६ कोटी रुपयांचे सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे. तर २१.२४ कोटी रुपयांचे मद्य, ६.१२ कोटी रुपयांचे ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे.

पैसे आणि मद्याच्या अमिषाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही हेराफेरी होत असल्याचे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, हे पैसे कुठून कुठे जात होते, याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची यावर नजर आहे. मुंबईमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिलला मतदान होणार आहे. तोपर्यंत काळा पैसा आणि मद्याची ने-आण वाढण्याची शक्यता आयोगाने वार्तवली आहे.