कोट्यवधीत सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘त्या’ गावांना निवडणूक आयोगाचा दणका, ग्रामपंचायत निवडणूक रद्द

मुंबई – पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच काही ग्रामपंचातींमध्ये सरपंच तसेच सदस्यपदांसाठी चक्क लिलाव जाहीर करून कोट्यवधी बोली लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकाराची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत सरपंच आणि सदस्यपदांसाठी जाहीर बोली लावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या गावातील ग्रामपंचायत निवडणूक रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या वृत्त प्रसिध्द झाले होते. तसेच आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचे मदान म्हणाले.