शिवसेना सोडण्याचं कारण आत्मचरित्रात उलगडणार : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा जीवनपट लवकरच उलगडणार आहेत. आत्मचरित्रांतून अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत दिले राणे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण आपल्या आत्मचरित्रातून समोर येईलच असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्यामागचं कारण आपण आत्मचरित्रातून उलगडणार असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर आत्मचरित्रातून अनेक गुपितांवर प्रकाश टाकला जाईल असं सांगताना नारायण राणे म्हणाले आहेत की , ‘माझ्या आत्मचरित्रात मी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा या सगळ्या पक्षांमधल्या प्रवासाबाबत लिहिलं आहे. उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला तेदेखील आपण आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.’

नारायण राणे सध्या आत्मचरित्र लिहीत असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल अशी माहिती त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे दिली होती. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटल होत की , ‘माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा. ‘खासदार नारायण राणे यांचं आत्मचरित्र लिहून तयार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द
नारायण राणे हे एक महत्वकांशी नेते म्हणून ओळखले जातात. एक चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा लांबचा टप्पा नारायण राणे यांनी गाठला आहे. राणे यांनी १९७२ मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ३ जुलै २००५ ला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली परंतु शिवसेनेतून जाताना राणे अनेक समर्थक घेऊन कॉंग्रेसमध्ये गेले. ८ ऑक्टोबर २००८ साली नारायण राणे यांनी प्रहार नावाचे वृत्तपत्र सुरु केले. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली. नारायण राणे यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले असून सध्या ते राज्यसभेत खासदार आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत गेले आहेत.