घरातील ‘बोअरवेल’ मधून पाण्याऐवजी निघालं ‘तेल’, सरकारी अधिकारी गावात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील भगवानपुरा गावात एका घरात हातपंपातून तेल निघाले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रचंड जमाव जमला आणि ही माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी तेथील तेलाचे नमुने घेण्यात आले आहेत, जे की प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातील. हातपंपातून येणारा तेलकट पदार्थ हा ज्वलनशील असल्याचे समोर आले आहे.

भगवानपुरा गावात अ‍ॅडव्होकेट प्रमोदकुमार यांचे घर आहे, काही दिवसांपूर्वी त्यांनी तिथे पाण्यासाठी एक बोरिंग केली होती, तेव्हापासून पाणी सुरक्षित येत होते, परंतु शनिवारी सकाळी अचानकच तेलयुक्त पाणी नळाच्या बाहेर येऊ लागले, ते पाहून कुटुंब आश्चर्यचकित झाले. जेव्हा लोकांना या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा तेथे मोठी गर्दी जमली.

लोकांना वाटले की जमिनीत तेलाचा साठा असावा, कारण गेल्या वर्षी चेन्नई येथील एका पथकाने रामपूर भागातील ताजपूर तिगरा गावात तेल साठा असण्याची शंका वर्तविली होती. त्यावेळी या पथकाने तेथील नमुनेही सोबत घेतले होते, परंतु त्यानंतर पुढे काय झाले हे कोणालाही माहिती नाही. भगवानपुरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हातपंपातून तेल निघाले हे समजताच लोकांना वाटू लागले की खरोखर जमिनीत तेलाचा साठा असावा.

काही लोकांनी नळातून निघणाऱ्या तेलकट पदार्थास जाळले आणि हा व्हिडिओ व्हायरल देखील केला. या प्रकरणाची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी पी.एल. मौर्या गावात पोहोचले. जेव्हा त्यांनी त्यांच्या समोर हातपंप चालवला तर तेलकट पाणी बाहेर आलं, तेव्हा त्यांची खात्री पटली. दरम्यान एसडीएम यांनी सांगितलं की नमुना घेण्यात आला आहे, जो की तपासणीसाठी पाठविला जाईल.