भाजपा उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन आढळल्याने पुन्हा होणार मतदान, 4 अधिकारी निलंबित

आसाम : वृत्तसंस्था – आसाम राज्यातील विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी १ एप्रिलला पार पडलं. तर मतदान झाल्यानंतर भाजप नेत्या उमेदवाऱ्याच्या गाडीत चक्क EVM मशीन आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून विरोधकांनी संताप व्यक्त करत भाजपासह निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं होत. या प्रकरणावरून विरोधकांच्या अनेक संतप्त प्रतिक्रियानंतर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील विधानसभेच्या ३९ जागांसाठी मतदान झालं. राताभरीतील एमव्ही शाळेत असलेल्या केंद्र क्रमांक १४९ वर १ एप्रिल रोजी रात्री ९.२० वाजता हा घटना प्रकार घडला आहे. तर तेथील मतदान केंद्रावरील EVM मशीन आढळून आले होते. त्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेतले जावे असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदान झाल्यानंतर एका खासगी गाडीत नागरिकांना EVM मशीन सापडली. ही गाडी त्याच मतदारसंघातील भाजपा उमेदवाराची असल्याचं नंतर उघड झालं. तर हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्यावर राजकीय चर्चेला रंग येऊ लागला. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भाजपासह निवडणूक आयोगावर टीका करत कारवाई करण्याची मागणी केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एका वाहनाची मदत घेतली. वाहनाच्या मालकाबद्दल कोणतीही चौकशी न करता EVM आणि इतर साहित्यासह त्या गाडीतून प्रवास केला. EVM मशीनसह भाजपा उमेदवाराच्या पत्नीच्या गाडीतून प्रवास केला. EVM मशीनसोबत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. परंतु, करीमगंजमधील या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तसेच निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत ४ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे, या प्रकरणावरून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, क्या स्क्रिप्ट है?” असं म्हणत प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं आहे. “निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला रामराम म्हणायचं का?,” असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला होता.