ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत, ५० हजार कोटी रुपये पाण्यात

लखनऊ (युपी) : वृत्तसंस्था – ईव्हीएममधील बिघाडावरून समाजवादी पक्षाने मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. देशात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी ईव्हीएममधून भाजपालाच मत जात असल्याची तक्रारी येत आहेत. हा गंभीर प्रकार असून निवडणूक प्रक्रियेकवर खर्च केले जाणारे ५० हजार कोटी रुपये पाण्यात गेले असल्याचा आरोप सपा नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.

देशामध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातील दहा जागांवर आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशसह देशात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सपा नेते अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला. देशभरात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या किंवा भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने या तक्रारी समोर येत आहेत. जवळपास साडे तिनशेहून अधिक ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आहेत. हे फौजदारी स्वरुपाचे कृत्य आहे, असा आरोपी यादव यांनी केला. या निष्काळजीपणामुळे ५० हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले.

अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यांनी आज सैफईत मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे सपा नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान यांनी देखील भाजपावर आरोप केले आहेत. काही ठिकाणी पोलीस मतदारांना धमकी देत आहेत, तर जिल्हाधिकारीही सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला.