राज्यातील पहिलीच मोठी घटना ! ‘या’ कारणासाठी कार्यकारी अभियंत्याला कोर्टातच अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे उड्डाण पुलासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्याला वाढीव मोबादला देण्याचा आदेश दिला असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला न्यायालयातच अटक करण्यात आली. विलास ब्रिजलाल पाटील (वय ४५, रा़ जळगाव) असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. भूसंपादन प्रकरणात कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

अटक केल्यानंतर विलास पाटील यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची तीन दिवसांसाठी कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबतची माहिती अशी, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे रेल्व उड्डाण पुलासाठी जमीन भूसंपादनाची अधिसूचना ३० एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली होती. शेतकरी भूषण चिंचोरे, रामराव पाटील, शकुंतला पोरवाल व सुरेश पाटील या शेतकऱ्यांनी वाढीव मोबादला मिळण्यासाठी भूसंपादन कायद्याच्या कलमानुसार न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने मार्च २०१९ रोजी निकाल देताना शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर केला होता. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव मोबदला दिला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुनहा एकदा न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली.

न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल न घेतल्याने विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने दिलेले १ कोटी ७५ लाख रुपयांचे धनादेश जप्त केले. त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयात पैसे भरले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे बँक स्टेटमेंट व स्थावर मिळकतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली तरी कार्यकारी अभियंता विलास पाटील हे न्यायालयात हजर झाले नव्हते.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कैदी वारंट बजावण्यात आले. ते बुधवारी न्यायालयात आल्यानंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या या कारवाईने शेतकºयांना नाडणाऱ्या  व न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्याचा अवमान करणाऱ्या  शासकीय अधिकाऱ्यांवर केलेल्या या कारवाईने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com