मुंबई : वृत्तसंस्था – देशात पश्चिम बंगालची निवडणूक आरोप, प्रत्यारोपांमुळे गाजली. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून अनेक मुद्यावरून टीका करण्यात आली. त्यातच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालची निवडणूक गाजली. अमित शहांनाच्या रॅलीमधील हिंसाचार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकण्याचे विरोधकांचे वक्तव्यामुळे यंदाची निवडणूक आणखीच चुरशीची झाली. यामुळे या राज्यातील निकालाकडे देशातील जनतेमध्ये उत्सुकता आहे.
भाजपाने पश्चिम बंगालकडे सेफ डिपॉझिट म्हणून पाहिले. जर एखाद्या राज्यात खड्डा पडला तर तो या ठिकाणी भरून काढता येईल. या ठिकाणी सहाव्या टप्प्यात मतदान झाले आणि देशात सर्वात जास्त मतदान याच राज्यात झाले. त्यामुळे झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला याचा फटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २३ मेला निकाल लागेल मात्र आज शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे.
एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला २४ जागा मिळतील. मात्र, २०१४ च्या निकालानुसार यंदा तृणमूल काँग्रेसला १० जागांचा फटका बसणार आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत एनडीएला फक्त २ जागा मिळाल्या होत्या. यंदा एनडीएचा १४ जागांचा फायदा होणार असून एनडीए १६ जागांवर विजयी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर युपीएचा देखील यावेळी फायदा होणार आहे. यावेळी युपीएला ४ जागा मिळणार असून मागील वेळी युपीएला २ जागी विजय मिळाला होता. मात्र, डाव्या आघाडीला मोठा फटका बसणार आहे. मागीलवेळी डाव्यांना दोन जागा मिळाल्या होत्या मात्र यंदा त्यांची एकही जागा येणार नसल्याचे पोलच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
एनडीएची मतांची टक्केवारी घटली
पश्चिम बंगालमध्ये २०१४ च्या तुलनेत एनडीएच्या जागा जरी वाढल्या असल्या तरी एनडीएच्या मतांची टक्केवारी कमी होताना दिसून येत आहे. एनडीएच्या मतांमध्ये ८ टक्क्यांनी घट झाल्याचे पोलच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर अपक्ष आणि इतर पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच युपीएच्या मतांच्या टक्केवारीत ३ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.