आ. विनायक मेटेंचा महाविकासवर हल्लाबोल, म्हणाले – ‘चव्हाण यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार हे आधी सांगा’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याने केलेला कायदा घटनाबाह्य ठरवत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निर्वाळा दिला. यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर यावरून शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हा कायदा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाला असल्याने अशोक चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखविण्यापेक्षा मराठा समाजासाठी स्वतः काय करणार हे स्पष्ट करावे, अशा शब्दात मेटे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने मराठा समाजावर आकाश कोसळले आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींचे भविष्य अंधकारमय झाले आहे. ठाकरे सरकारने विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. वारंवार दुर्लक्ष केल्याने कोर्टात आरक्षण रद्द झाले. असा आरोप त्यांनी केला. या कारणामुळे मराठा समाजावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अन्यायाच्या विरोधात मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन केलं जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. असे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

तसेच, राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये. मराठा समाजाला न्याय, आरक्षण कसे देणार, कुठल्या सुविधा देणार हे अगोदर सांगावे अशी मागणी त्यांनी केलीय. तर अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहि त्यामुळे त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मेटे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. या दरम्यान पुढे आ. मेटे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चा आणि अन्य विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन २०१६ सालाप्रमाणे मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. १५ तारखेला राज्यातील लॉकडाऊन संपले तर पुढील काही दिवसांत पहिला मोर्चा बीडमध्ये काढला जाणार आहे असे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी म्हटले आहे.