कोरोना व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांना टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतून देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी कोरोना परिस्थितीवरुन सरकारच्या कामावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली. यावेळी पुन्हा येईन…. पुन्हा येईन वरुन ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले, आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं ? काय करु नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला. ज्या लोकांनी मला संपर्क केला. जो मला प्रतिसाद मिळाला, त्यात महाराष्ट्रातील जनता मला मानायला लागले. ही माझ्या आयुष्यासाठी मोठी कमाई आहे. पण, मी नेमकं काय करत होतो. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय ? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाऊन करायचा की नाही. मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करु नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन… पुन्हा येईन… काळजी घ्या. दुर्दैवानं थोडसं इकडेतिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा फायदा कोरोना लसीकरणामध्ये होत आहे. सध्या मी जबाबदार योजना राबवली जात आहे. सरकार काम करत आहे. देशातील सर्वात मोठं जंम्बो कोविड हॉस्पिटल सरकारनं राज्यात उभारलं. महाविकास आघाडी सरकारनं कोरोना काळात नागरिकांना 5 रुपयांना शिवभोजन थाळी दिली. आम्ही रिकाम्या थाळ्या वाजवल्या नाही. राज्यपालांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. विरोधकांनी नुसत्या थाळ्या वाजवल्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.