तलाठ्याच्या मदतीने शेतजमीन लाटली

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी स्टेशन या ठिकाणी जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी येथील तब्बल १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवंडी स्टेशन या ठिकाणी विजय निवृत्ती जगताप ( रा. बेलवंडी, हल्ली रा. सोनवडी, ता. दौंड ) यांनी बेलवंडी गावच्या शिवारात गट नं. ३०५ व ३१२ मध्ये शेतजमीन होती. २६ जून १९९५ ते आजपर्यंत हे बाहेरगावी राहत असल्यामुळे बेलवंडी गावातील मारुती सीताराम जगताप, ज्ञानदेव सीताराम जगताप, जयसिंग मारुती जगताप, चंद्रकांत मारुती जगताप, विलास मारुती जगताप, भाऊसाहेब नामदेव जगताप, शैला भाऊसाहेब जगताप, पोपट दादा जगताप, दत्तात्रय पोपट जगताप, शंकर पोपट जगताप, पोपट गोपीचंद जगताप, तुषार गोपीचंद जगताप (सर्व रा. बेलवंडी बुद्रुक) यांनी तलाठी आर. एस. कदम यास हाताशी धरून जमिनीचे बनावट दस्तावेज तयार केले. जमीन ताब्यात घेऊन लाटण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी विजय निवृत्ती जगताप यांच्या फिर्यादीवरून तलाठ्यासह तब्बल १३ जणांविरुद्ध भादंवि ४२०,४४७,४३७,४३८,४७१,१२० ब प्रमाणे बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. के. घुगे हे करीत आहेत.