धक्कादायक ! बॅकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची 12 वर्षाच्या मुलासह आत्महत्या

कारंजा लाड : पोलीसनामा ऑनलाईन – कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बँकेेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याने 12 वर्षाच्या मुलासह राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गिर्डा (ता. कारंजा जि. वाशिम) येथे बुधवारी (दि. 31) सकाळी ही घटना उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अनंता बंडूजी मनवर (45) आणि मुलगा प्रतिक अनंता मनवर (वय 12 दोघेही रा. गिर्डा) अशी आत्महत्या केलेल्या बापलेकाची नावे आहेत.

ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंता मनवर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा शाखेतून शेतीकरीता कर्ज घेतले होते. यंदा विविध कारणांमुळे झालेली नापीकी आणि त्यातच 3 विवाहयोग्य झालेल्या मुलींचे लग्न कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. या विवंचनेत त्यांनी व मुलगा प्रतिक याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंधर करित आहेत.