तुळजापूर : बॅंकेच्या कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेच्या कर्जास आणि शेतीच्या नापिकीला कंटाळून एका 35 वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील वरवटी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने वरवटी परिसरातील शेतकरी, गावकरी, नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

नानासाहेब जीवनराव पवार (वय 35 वर्ष रा. वरवटी, ता. जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील वरवटी येथील नानासाहेब पवार यांनी एसबीआय या राष्ट्रीयकृत बँकेतील पिक कर्ज घेतले होते. यंदा शेती पिकली नाही, त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची याच्या तणावाखाली ते गेल्या काही दिवसांपासून होते. अखेरीस याच तणावातून त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास पोलिस कर्मचारी मुल्ला करत आहेत. दरम्यान संबंधित विभागाने दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.