शेतकरी आंदोलन : 8 डिसेंबरला भारत बंदची हाक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत सुरू असलेली चर्चा फोल ठरत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आता येत्या 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

शेतकरी विरोधी कायदे 5 डिसेंबरपूर्वी रद्द करा नाही तर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील, असा इशारा आम्ही सरकारला दिला होता. पण अजूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आता आम्ही 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करत असल्याचे शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. केंद्र सरकारला जाचक कृषी कायदे हे मागे घ्यावेच लागतील. आपण आता हे आंदोलन आणखी एक पाऊल पुढे नेत आहोत, असे ऑल इंडिया किसान सभेचे सचिव हन्नान मोल्ला म्हणाले.

शेतकऱ्यांना हटवावे यासाठी याचिका
शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवर गर्दी होत असून, कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता आंदोलकांना हटविण्यात यावे, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.