शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे ‘निर्देश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा जोतिराव फुले या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आज सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांना व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी माहिती दिली की राज्यात आतापर्यंत 1 लाख 25 हजार 449 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील.

या योजनेतील पहिली प्रायोगिक तत्वावरील यादी 24 फेब्रुवारीला लावण्यात आली होती, ज्यात 67 गावांमधील 15 हजार 358 खाती जाहीर केली होती. या दुसऱ्या यादीनंतर राज्यात आतापर्यंत 21 लाख 82 हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत.

काय आहे कर्जमुक्ती योजनेत –
राज्यात सध्या 15 जिल्हात पूर्णपणे तर ग्रामपंचायत निवडणूकांची आचारसंहिता लागू असल्याने 13 जिल्ह्यात अंशत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
अशा 36 लाख 45 हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर 34 लाख 98 हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
यासह गावनिहाय याद्या प्रसिद्ध झालेल्या खात्यांची संख्या 21 लाख 82 हजार इतकी आहे.
या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाकडून 14 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
काही भागात असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे 6 जिल्ह्यातील गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत.
प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बँका 24 तासात तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 72 तासात रक्कम जमा करतील.