पाण्यासाठी दौंड, शिरूरच्या शेतकऱ्यांचे भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर दौंड आणि शिरूर तालुक्यामध्येही बसत असून येथील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी भीमानदीला त्वरित पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी दौंड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज भीमा नदीपात्रामध्ये ठिय्या आंदोलन केले.

यावेळी शिरूरचे माजी आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, दौंड राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी किसान आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली शेळके यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि दौंड, शिरूरमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या आंदोलणावेळी शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी शिरूरचे भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. पाण्याचे योग्य नियोजन केले नाही त्यामुळे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती ओढवली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी मुख्यमंत्री ए.सी.मध्ये बसून दुष्काळाची माहिती घेतात हे दुर्दैवी असून या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नाही अशी टीका केली. दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार आणि माऊली शेळके यांनीही शेतकऱ्यांची पिके आणि जनावरे जगविण्यासाठी त्वरित पाणी सोडण्याची मागणी केली. आंदोलनाच्या शेवटी शिरूरचे नायब तहसीलदार हत्ते यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.