रस्ता रूंदीकरणाततील बाधित शेतकर्‍यांना मोबदला मिळाला पाहिजे, मा. खासदार आढळराव पाटलांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

शिरूर : प्रतिनिधी –   न्हावरा ते तांदळी ता.शिरूर या एन एच ५४८ डी या महामार्ग रस्ता रुंदीकरणामुळे न्हावरा,निर्वी,शिरसगाव काटा,पिंपळसुटी,इनामगाव व तांदळी या गावांमधील ६०० शेतकरी बाधित होत असुन याबाबत जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांची शेतक-यांसह भेट घेऊन रस्ता रूंदीकरण करताना बाधीत शेतक-यांना मोबादला मिळाला पाहिजे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

यावेळी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके,जिल्हा समन्वयक रविंद्र करंजखेले,मच्छिद्र गदादे,उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार,तालुका प्रमुख सुधीर फराटे,विधानसभा संघटक विरेन्द्र शेलार,माजी उपतालुका प्रमुख शिवाजीराव मचाले,शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे,विजय मोकाशी,राजेंद्र कोरेकर,राजेंद्र चव्हाण,रावसाहेब फराटे,ॲड.हिलाळ,लक्ष्मण कळसकर,दत्तात्रय नलगे,दिपक कोकडे,दशरथ बनकर,किरण नवले,अक्षय पारखे,विपुल कळसकर,भुजंगराव कळसकर,नाना कळसकर,संदीप कदम,स्वप्निल काटे,प्रशांत चव्हाण,जालिंदर मचाले,पोपटराव गदादे तसेच विविध विभागाचे अधिकारी,शिवसेना पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

बुधवार दि.२१ रोजी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन रस्तारंदीकरणामुळे बाधित शेतक-यांना मोबादला मिळावा या मागणीच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तळेगाव दाभाडे-शिक्रापूर-न्हावरा-इनामगाव या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा एन एच ५४८ डी हा दर्जा देण्यात आला आहे.या रस्त्यावरील तांदळी ते इनामगाव हा यापुर्वी ग्रामीण मार्ग क्र.४० होता.तसेच इनामगाव ते न्हावरा हा राज्य मार्ग क्र.५५ होता.मात्र सदर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्यानंतर रस्त्यालगतच्या न्हावरा,निर्वी,शिरसगाव फाटा,पिंपळसुटी,इनामगाव व तांदळी आदि गावांतील सुमारे ६०० शेतकरी बाधित होत आहेत.मुळात सदरचा रस्ता पुर्वीपासून ग्रामीण मार्ग असल्याने येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या या भागात शेती करीत आहेत. काही शेतकऱ्यांची या भागात घरेही आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिपीआर) तयार करताना संबधित कन्सलटंट कंपनीकडून अनेक चुका झाल्याच्या येथील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

डिपीआर बनवताना काही ठिकाणी ज्या गटांमधून महामार्ग दाखविण्यात आला आहे त्याऐवजी अन्य गटांतून महामार्ग घेण्यात आला आहे. ग्रामीण मार्गाचे महामार्गात रूपांतर करताना सदर रस्त्याची मोजणी करण्यात आलेली नाही, तसेच महामार्ग हद्द ठरविताना बाधित शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस प्रशासनाकडून देण्यात आली नसून विश्वासात घेतलेले नसल्याच्या येथील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.तसेच या मार्गावरील तळेगाव ढमढेरे ते न्हावरा या मार्गाचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात आला आहे.

या भागातील शेतकऱ्यांचा महामार्ग कामाला कुठलाही विरोध नाही. मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व शासकीय नियमानुसार भूसंपादनाचा योग्य मोबदला देऊन संपादन प्रक्रिया राबवावी अशी येथील शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.तरी यासंदर्भात लक्ष घालुन एन एच ५४८ डी तळेगाव दाभाडे-शिक्रापूर-न्हावरा-इनामगाव रस्त्यावरील न्हावरा ते तांदळी हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही यादृष्टीने जमिनीचे संपादन करुन शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळणेकामी संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.