मानलं ‘या’ बळीराजाला ! मुलीची पाठवणी केली थेट हेलिकॉप्टरनं

नांदेड : पोलिसनामा ऑनलाइन – मराठवाड्यात शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात चक्क हेलिकॉप्टरने वरात आणि पाठवणी झाली असून त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. या शेतकऱ्याने आपल्या मुलीची इच्छा असल्यामुळे तिच्या लग्नाची वरात आणि पाठवणी हेलिकॉप्टरने केली आहे. हा लग्नसोहळा नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाच्या नारायणराव कदम यांच्या मुलीचा असून रविवारी तिचे लग्न झाले.

नारायणराव कदम यांची मुलगी शिल्पाचे लग्न हिंगोलीतील उखळी गावाच्या मोहन गायकवाड याच्यासोबत झाला. शिल्पाने हेलिकॉप्टरने आपली वरात निघावी, अशी इच्छा वडिलांकडे केली होती. त्यामुळेच मुलीची इच्छा पूर्ण करायचे असे वडील आणि भावाने ठरवले. नवरदेवाची वरात पिंपळगाव येथे असलेल्या मंगल कार्यालयाजवळ आली. त्यानंतर नवरदेवाच्या गावापर्यंत त्यांची पाठवणी हेलिकॉप्टरने केली गेली. यासाठी कदम यांना जवळजवळ ८ लाख रु.चा खर्च आला. तरीही त्यांनी आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केली.

नारायणराव कदम राहतात त्या अर्धापूर या भागात कॅनॉलचे पाणी येते, त्यामुळे ऊस आणि हळद ही नगदी पीके घेतली जातात. तसेच कुटुंबातील सगळ्यांची इच्छा होती आणि शेतकरीही काहीतरी करू शकतो, हे दाखवून द्यायचे असल्याने लग्नात हेलिकॉप्टर आणल्याचे नारायणराव कदम यांनी सांगितले. या लग्नात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण याही उपस्थित होत्या. या नवदाम्पत्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंबच हेलिपॅडवर जमले होते.