3 लाखांपर्यंत शेतकर्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज, ‘या’ तारखेपासून होणार अंमलबजावणी
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शेतकर्यांना आता 3 लाख रुपयापर्यंतचे पीककर्ज बिगरव्याजी दिले जाणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार असून राज्यातील बागायती आणि जिरायती अशा दोन्ही शेतकर्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
राज्यात खरीप हंगामात सुमारे 43 लाख शेतकर्यांना तब्बल 74 हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचा आराखडा तयार केला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनुसार आता बळीराजाला 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. 2 लाखांवरील शेतकऱ्यांसह नियमित कर्जदारांसाठी मिळणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय राखून ठेवला. तरीही नियमित कर्जदारांना 6 टक्के व्याजदराने मिळणारे 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्क्यांनी देण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी 3 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर केंद्र सरकारकडून 3 टक्के व्याज सवलत दिली जाते. तर राज्य सरकारकडून 1 टक्का दिली जाणारी सवलत आता 3 टक्के केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 6 टक्क्यांऐवजी 3 लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळेल. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांकडून जिल्हा बॅंकांना 62 हजार कोटींच्या कर्जाची रक्कम येणेबाकी आहे. या पार्श्वभूमीवर आता जे शेतकरी त्यांच्याकडील कर्जाची थकबाकी वेळेत भरतील, ते त्यासाठी पात्र ठरणार आहेत. सोलापूर जिल्हा बॅंक 334 विकास सोसायट्यांमधून तीन लाखांचे पीक कर्जवाटप करणार आहेत.
याबाबत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासक शैलैश कोथमिरे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वर्षांपासून 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदाराने दिले जाते. राज्य सरकारच्या घोषणेनुसार सोलापूर जिल्हा बॅंकही जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, अथवा जे मुदतीत कर्जाची परतफेड करतील त्यांना एप्रिलपासून तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज दिले जाईल.