सेना उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहून शेतकर्‍याची आत्महत्या

पत्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे चार एकर जमिनीचे ओमराजे आणि विजय दंडनाईक यांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटूंबाचे हाल झाले आहेत.

त्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. सविस्तर पुरावे घरी कपाटातील पिशवीत पहायला मिळतील, असे चिठ्ठीत नमूद करून उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आणखी एका पत्रात त्यांनी थेट उध्दव ठाकरे यांचाही उल्लेख केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे (वय 59) यांनी शुक्रवारी पहाटे शेतातील झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या खिशातून ढोकी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे एक पत्र मिळून आले आहे. ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी केलेल्या फसवणुकीमुळेच आपल्यावर ही वेळ आली.

या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.

या चिठ्ठी व्यतिरिक्त मतदारांना केलेले दोन पानी आवाहनपत्र देखील त्यांच्या खिशात आढळून आले आहे. यात तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी 72 शेतकर्‍यांच्या नावे प्रत्येकी तीन लाख रूपयांचे कर्ज काढण्यात आले. या कर्जाची परतफेड करण्याची हमी कारखान्याच्या संचालक मंडळाने शपथपत्राद्वारे बँकेकडे दिली. मात्र कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे 72 लोकांच्या जमीन आणि वाहनांच्या लिलावाची कारवाई करण्यात आली. काहीजणांच्या जमिनी लिलाव करून विक्री देखील करण्यात आल्या आहेत.

आपण सर्व मध्यमवर्गीय शेतकरी आहोत. हे कर्ज फेडणे आपल्याला शक्य नसल्यामुळे 72 पैकी 20 जणांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबई गाठले. मातोश्री बंगल्याच्या गेटजवळ दोन दिवस रणरणत्या उन्हात रस्त्याच्या कडेला थांबलो. मात्र ओमराजे यांनी त्यांचा प्रभाव वापरून उध्दव ठाकरे यांची भेट होऊ दिली नाही, असेही ढवळे यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांनी ओम राजेनिंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले, त्यांचेच संसार ओमराजे यांनी फसवणूक करून उध्वस्त केले आहे. आज मुद्दल आणि व्याजासह प्रत्येकाच्या डोक्यावर दहा ते बारा लाखांचे कर्ज आहे. त्यामुळे संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांनी काय करावे ? असा सवालही ढवळे यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे.

ठाकरे भेटले असते तर जीव वाचला असता

दिलीप ढवळे यांच्याप्रमाणेच फसवणूकीला बळी पडलेले श्रीमंत तांबारे देखील मुंबई येथे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र भेट न होऊ शकल्याची ते खंत व्यक्त करतात. उध्दव ठाकरे यांची भेट झाली असती तर काहीतरी मार्ग नक्की निघाला असता. आत्महत्या करण्याची वेळ ढवळे यांच्यावर आली नसती. आज दिलीप ढवळे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. उद्या आमच्यावर ती वेळ येणार आहे. जमीन विकून कर्जाची परतफेड करावी लागेल. अन्यथा आत्महत्या करण्याखेरीज दुसरा पर्याय आपल्यासमोर शिल्लक नसल्याचे श्रीमंत तांबारे यांनी सांगितले.

योग्य ती कायदेशीर कारवाई होईल

कसबे तडवळे येथील शेतकर्‍याने फसवणुकीतून आत्महत्या केली असल्याची माहिती प्राप्त होताच कर्मचार्‍यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले. त्यांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांच्या समक्ष ताब्यात घेतल्या आहेत. कुटूंबियांचा जबाब नोंदवून प्रकरणाची खातरजमा केली जाईल. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी सांगितले.