तेव्हा आपल्याकडे राफेल असते तर…: नरेंद्र मोदी

जामनगर : वृत्तसंस्था – एअर स्ट्राइकवरुन प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हल्ला चढवला आहे. दहशतवाद संपावा ही देशवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी सैन्याची कारवाई सुरू आहे. मात्र काही लोकांना सैन्याच्या कारवाईवर विश्वास नाही, अशी टीका मोदींनी आपल्या विरोधकांवर केली आहे. मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. तेथील जाहीर सभेत मोदींनी पाकिस्तानसह विरोधकांवर निशाणा साधला.

भारताला उद्ध्वस्त करण्याचा मानस बाळगणाऱ्यांना हा देश सोडणार नाही. दहशतवाद हा आजार आहे आणि आम्ही त्या आजाराच्या मूळावर घाव घालत आहोत. शेजारचा देश दहशतवादाचं मूळ आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादाचा मूळापासून निपटारा करत आहोत, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

विरोधकांचा सैन्यावर विश्वास नाही. मात्र आम्हाला सैन्याचा अभिमान वाटतो. आम्हाला दहशतवाद संपवायचा आहे. दहशतवाद संपवणं हेच आमचं ध्येय आहे. मात्र त्यांना (विरोधकांना) केवळ मोदीला संपवायचं आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

हवाई हल्ल्याच्यावेळी आपल्याकडे राफेल विमान असतं, तर आपलं एकही विमान कोसळलं नसतं आणि त्यांचं एकही विमान वाचलं नसतं, असं मोदींनी सांगितलं. परंतु राफेल करारासाठी काँग्रेसनं प्रचंड वेळ घालवला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.