पुनर्वसनापोटी नवी मुंबईतील खारघर येथे मिळालेल्या जमिनीत भागीदार करुन घ्या नाहीतर त्याबदल्यात दहा कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली असल्याचा आरोप करत आंबेगाव (पुणे) येथील श्रीकृष्ण गोसावी यांनी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर खंडणी मागितल्याची तक्रार नवी मुंबई पोलिसांत केली आहे. त्या अनुषंगाने माजी आ. येळगावकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेवून आ. गोरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, माण-खटाव विधानसभा मतदार संघाचा आणि खारघर (पनवेल) येथील पुनर्वसनाचा काहीएक संबंध नाही. पुनर्वसनातील ही जमीन लाटायचीच हाच केवळ त्यांचा उद्देश आहे. यामध्ये फक्त आ. गोरेच नाहीत तर सातारा जिल्ह्यातील आणखी काही बडे नेते असून लवकरच आपण त्यांचा भांडाफोड करणार आहे.
येळगावकर यांनी अशाप्रकारे गंभीर आरोप केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येळगावकर यांनी आरोप केल्यानंतर आ. गोरे यांच्या समर्थकांनीही पत्रकार परिषदे घेतली. माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना जनतेने निवडून दिले आहे. गेली दोन टर्म ते निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना माजी आमदार दिलीप येळगावकरांनी जपून बोलावे. आ. गोरेंना आडविण्यासाठी येळगावकरांसारख्या बऱ्याच जणांचे प्रयत्न सुरू असतात. तरीही त्यांच्या कृत्यांना आ. गोरे. पुरुन उरले आहेत. त्यांचे काम ते जोमाने करत आहेत. मुळातच येळगावकरांचे स्वत:चे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करु नयेत, असा गर्भित इशारा वडूजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव यांनी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला.